येळ्ळूर साहित्य संमेलन संमेलनाची तयारी पूर्णत्वाकडे : चार सत्रात आयोजन
येळ्ळूर ता. 8 : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने रविवार दि. 11 रोजी सीमासत्याग्रही, स्वातंत्र्य सैनिक दिवंगत बाबुराव ठाकूर संमेलन नगरीत, श्री शिवाजी विद्यालय येळळूर च्या पटांगणात, 19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार (कोल्हापूर) यांच्या अध्यक्षतेखाली चार सत्रात हे संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनात संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्यिक व सामाजिक पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
पहिल्या सत्रात संमेलनाध्यक्ष श्रीराम पवार (कोल्हापूर) आपले अध्यक्षीय भाषण करणार असून दुसऱ्या सत्रात समाजसेविका व रमाबाई आंबेडकर पुरस्कार विजेत्या ज्योती पठाणिया (पुणे) आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. तसेच या सत्रात वसंत हंकारे (सातारा) यांचा पुन्हा जगुया आनंदाने हा कार्यक्रम होणार आहे. तिसऱ्या सत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
चौथ्या सत्रात सातारा येथील तानाजी कुंभार व सहकाऱ्यांचे विनोदातून समाज प्रबोधन करणारे भारुड सादर करणार आहेत. या संमेलनाचे उद्घाटन टिळकवाडी येथील हॉटेल उदय भवन चे मालक सूर्यकांत केशव शानभाग यांच्या हस्ते होणार आहे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून येळळूर ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पुंडलिक पाटील हे असणार आहेत. रविवारी सकाळी 8:30 वाजता ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी मंदिरापासून ग्रंथ दिंडीला सुरुवात होणार आहे. साहित्य संघाच्या वतीने साहित्यिक व निमंत्रित पाहुण्यांना निमंत्रण देणे, व इतर तयारीला वेग आला असून,, संमेलन मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे. संमेलनाला उपस्थित साहित्य रसिकांना प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी प्रा. यल्लोजीराव निंगोजीराव मेणसे (येळळूर) यांच्याकडून, नेताजी मराठी सांस्कृतिक भवन येळळूर या ठिकाणी अल्पोपहार देण्यात येणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या